म्हापसा नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात केल्याने हणदोण्याच्या आमदारांना आनंद
म्हापसा ः जलस्त्रोत खात्याने सोमवारी म्हापसा नदीचा जलपर्णीमुळे अडलेला प्रवाह सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. या कामाला वेळेत सुरुवात केल्याबद्दल हळदोण्याचे आमदार ऍड. कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांचे आभार मानले.
‘जलस्त्रोत खात्याने कामाला सुरुवात केल्याबद्दल आनंद आहे. नदीचा प्रवाह अडल्याचे सर्वांच्याच निदर्शनास येत होते. यासाठी सुभाष शिरोडकर यांच्याशी अनेक पत्रव्यवहार करून त्यांच्या नजरेत ही बाब आणून देण्यात आली होती. त्यांनी तात्काळ यामध्ये लक्ष घातले,’ असे ऍड. फरेरा यांनी सांगितले. ‘मी शिरोडकर यांचे आभार मानतो. ते धडाडीचे नेते आहेत. तार नदीवरील पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले होते त्यावेळेसही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून आम्ही दिली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिल्याने त्यांचे आभार, असे ऍड. फरेरा पुढे म्हणाले. हॉटेल ग्रीन पार्क ते गिरी मयडे व त्यापलीकडेदेखील या जलपर्णीचे साम्राज्य वाढले होते. त्यातून आता नदी मुक्त होणार आहे. नदीचा प्रवाह अडल्यामुळे गिरी, बस्तोडा व पालये आदी ठिकाणी पूर येत होता. जलपर्णीमुळे पाण्याचा दर्जादेखील खालावला होता. त्यामुळे पाण्याला पुरेसा सूर्यप्रकाशही मिळत नव्हता. नदीतील मासे व इतर जीवांवरदेखील याचा परिणाम झाला होता. खाण्यायोग्य नसलेल्या माशांची संख्यादेखील नदीत वाढली होती, असे फरेरा म्हणाले. नवीन पुल बांधण्यासाठी कंत्राटदाराने मातीत भराव घालून पर्यायी मार्ग केल्यामुळे जलपर्णी वेगाने वाढली. काही स्वयंसेवी गटांनी आपल्यापरीने या मुद्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. जलपर्णी हटविण्याचे काम आता हाती घेतले नसते तर नदीचा अधिक मोठ्या प्रमाणात र्हास झाला असता. याचा गंभीर परिणाम जवळच्या शहरांना तसेच गावांनादेखील झाला असता. आता संबंधिक कंत्राटदाराने मान्सूनमध्येदेखील मशीनच्या माध्यमाने हे काम करणार असल्याचे सांगितले आहे.