*महिलांनी धर्माचरणाची कास सोडू नये ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था*
पणजी, १७ सप्टेंबर – प्रत्येक महिलेने आपले कुटुंब, नोकरी, व्यवसाय या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असतांना आपले आचरण हे धर्म आणि संस्कृती यांना धरूनच ठेवले पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी केले. सुराज्य न्यासाच्या वतीने पर्वरी येथील सार्थकम् सभागृहात न्यासाच्या अध्यक्षा सौ. चंद्रिकाताई पाडगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘भारतीय संस्कृतीत महिलांचे स्थान’ या विषयावर आयोजित प्रवचनात सौ. शुभा सावंत बोलत होत्या. या वेळी ‘सुराज्य न्यासा’चे संस्थापक डॉ. सूरज काणेकर, पंचसदस्या सौ. शीतल आरोलकर आणि सनातन संस्थेच्या सौ. विशाखा म्हांबरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि श्री गणेशवंदन यांनी झाली. सौ. शुभा सावंत पुढे म्हणाल्या, “जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर आदी सर्वांनी राज्यकारभार सांभाळला; परंतु धर्माचरणाची कास कधीही सोडली नाही. स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावणे याला आध्यात्मिक महत्त्व, तसेच शास्त्रीय कारण आहे. सध्या समाजात घडत असलेली लव्ह जिहाद आदी समस्या महिलांना भेडसावत आहेत. या अनुषंगाने स्त्रिया व मुली यांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.”
या प्रवचनाचा ७० जिज्ञासूंनी लाभ घेतला. यांनतर सौ. चंद्रिकाताई पाडगावकर यांचा भारतीय संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विशाखा विराज म्हांबरे यांनी केले.
आपला नम्र,
*श्री. तुळशीदास गांजेकर,*
सनातन संस्था.
(संपर्क क्रमांक – ९३७०९५८१३२)