सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा मांद्रेचा विशिष्ट्यपूर्ण भजनी सप्ताह

.

सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा मांद्रेचा विशिष्ट्यपूर्ण भजनी सप्ताह

मांद्रेचे ग्रामदैवत श्री भगवती सप्तेश्‍वर प्रमुख पंचायतनचा सुप्रसिध्द भजन सप्ताहाला कार्तिक पंचमी, शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या रात्री प्रमुख उत्सव साजरा होणार आहे. तर द्वादशीदिनी सायंकाळी अखंड सप्ताहाची सांगता होणार आहे.

मांद्रे गावाला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. पोर्तुगीज काळातसुद्धा येथील ग्रामस्थांनी कला, उत्सव सुरू ठेवले होते. आजतागायत ही परंपरा अबाधित आहे. भजनी सप्ताहाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.
उत्सव, सण पंरपरा जपताना गोमंतकीयांनी भजनकलेचा पुरातन वारसा जपलेला आहे. मांद्रे गावातील भजन सप्ताह म्हणजे अजोड भक्तीची ठेव आहे. आषाढी, कार्तिकीला पंढरपुरात विठुराया चरणी मोठा सोहळा संपन्न होतो. वारकरी श्रध्देने विठुरायाच्या दर्शनासाठी वारी करत पंढरपूरला जातात . वारकऱ्यांना जे भक्तीचे सुख आणि समाधान तिथे लाभते तेच सुख आणि समाधान मांद्रेतील जनतेला श्री भगवती सातेश्वर चरणी भक्तीची सेवा रूजू करताना मिळते.
या प्रमुख पंचायतनात श्री सप्तेश्वर, श्री भगवती, श्री रवळनाथ, श्री नारायण, श्रीरामपुरुष अशी मंदिरे आहेत.
सप्ताहनिमित्त कार्तिकी एकादशीच्या रात्री पारकरी मंडळांतर्फे प्रसिध्द गायक कलाकारांच्या मैफिली आयोजित केल्या जातात. तसेच चित्ररथ मिरवणूकही होते. गावात वाड्यावाड्यावर मंदिरे आहेत. पण ग्रामदेवाचा उत्सव हा भव्यदिव्य असा असतो. देवस्थानात दसरोत्सव, शिमगोत्सव, जत्रोत्सव आदी अनेक उत्सव साजरे केले जातात. एकादशी सप्ताहादिवशी लोकांच्या उत्साहाला पारावर राहत नाही. आबालवृध्द भजनात दंग होतात.
कार्तिक एकादशी उत्सवाच्या अखंड भजनी सप्ताहाला यावर्षी शनिवारी दुपारी १२ वा. श्री भगवती सप्तेश्‍वर मंदिरात धार्मिक विधींनिशी सुरुवात झाली. या दिवशी “नंदादीप” प्रज्वलित करून श्री भगवती मंदिर सभागृहात ठेवण्यात येतो. त्यानंतर साळगांवकर पारकरी मंडळातर्फे भजन दिंडी मंदिरात येते. देवीचे दर्शन झाल्यावर भजनदिंडी नंदादीपाला प्रदक्षिणा घालून तेथे स्थिरावते व नंतर तीन – साडेतीन तास या मंडळांतर्फे भजनदिंडी होते. याप्रमाणे च्यारी समाज दांडोसवाडा, मधलामाज, आस्कावाडा, आश्‍वे, देऊळवाडा, जुनसवाडा या पारकरी मंडळांतर्फे क्रमवारीनुसार दिंडी-भजन अखंडपणे सुरू असते. दररोज सायंकाळी “दीपमाळ” साजरी होते. पारकरी मंडळांतर्फे यावेळी विशेष संगीत मैफली सादर होतात.
एकादशी उत्सवात रात्री च्यारी समाज पारकरी मंडळातर्फे श्री विठ्ठल रखुमाईचा चित्ररथ तर देऊळवाडा, आस्कावाडा, मधलामाज यांच्यातर्फेही देवदेवता अथवा संतांची चित्ररथ मिरवणूक होते. गायनाच्या मैफिली रात्रभर सुरू असतात. यादिवशी गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील भाविक श्रींची खणा नारळाने ओटी भरून आशीर्वाद घेतात.
संपूर्ण आठवडाभर सप्ताहात नंदादीपासमोरील भजनात खंड पडता कामा नये, ही परंपरा आजही कायम आहे. नंदादीपही सप्ताहाची सांगता होईपर्यंत अखंडपणे पेटता ठेवला जातो. हे सर्व व्रत असे मानून भक्तगण करतात.

प्रत्येक वाड्यात एक मंदिर आहे. गोव्यातील एकमेव असे ‘भारतमाता’ मंदिरही आस्कावाडा – मांद्रे येथील श्रीराम, सिद्धारूढ मठ परिसरात आहे.
श्री सत्तेश्वर भगवती पंचायतनातील बरेचसे उत्सव हे निसर्गाशी नाते जोडणारे आहेत. शिमगोत्सवात चार दिवस नाट्य महोत्सव होतो. त्याचा प्रारंभ श्रीगणेश वंदनाने होतो. त्यानंतर गावात वाड्यावाड्यावर नाट्यप्रयोग सादर होतात. ‘सुवारी वादन’ही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. गावातील आश्वे येथील श्री भूमिका मंदिर, गावडेवाडा येथील श्री सातेरी मंदिर येथेही परंपरेप्रमाणे सेवा होते. तसेच दसरोत्सवावेळी श्री रवळनाथ, श्री पावणाई आणि श्री भूतनाथ देवाची तरंगे सीमोल्लंघनाला जातात तेव्हा कलम वृक्षाकडे सोने लुटले जाते. जुनसवाड्यावर श्री महालक्ष्मी मंदिर, मधलामाज येथील श्री म्हाळसा गिरोबा मंदिरात तरंगे जातात. तर कवळासाच्या दिवशी आस्कावाडा पुर्खेवाडा येथील श्री रवळनाथ मंदिरात पावणेर होतो. पंचायतनातील उत्सव हे संपूर्ण गावात असे जोडले गेल्याने भजन सप्ताहात सारा गाव एकरूप होतो.

या भजन सप्ताहाची सुरुवात कशी झाली, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मांद्रे गाव तसा सुजलाम, सुफलाम. कष्टकरी लोक शेती बागायती करून उदरनिर्वाह करायचे. इतर वेळी मंदिरांमध्ये भजन, उत्सव साजरे करायचे.
सप्ताहाविषयी जाणकार माहिती देतात ती अशी… एका वर्षी या भागात पर्जन्यवृष्टी न झाल्याने दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली. सर्वांवर संकट ओढवले. त्यामुळे रोगराई वाढली. गुरे मरू लागली. मृग नक्षत्र उलटले तरी पाऊस काही झाला नव्हता, त्यामुळे लोकांचे हाल होऊ लागले. शेतीप्रधान गावावर अवकळा आली म्हणून गावातील लोकांनी ग्रामदैवत श्री भगवती सप्तेश्‍वरासमोर संकट दूर करण्यासाठी साकडे घातले आणि कृपाशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना केली. या ठिकाणी अखंड भजनी सप्ताह करण्यात येईल, असे लोकांनी गाऱ्हाणे घातले. भाविकांच्या हाकेला देव पावला. समाधानकारक पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि दैवतांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आषाढी एकादशीला २४ तासांचा भजनी सप्ताह सुरू केला. त्यावर्षी पीकही भरघोस आले. त्यामुळे दरवर्षी हा सप्ताह होऊ लागला.
काही वर्षांनी आषाढी एकादशीला २४ तास साजरा होणारा हा सप्ताह कार्तिक महिन्यात सलग सात दिवस साजरा करण्यात येऊ लागला. पावसाळ्यात सप्ताह साजरा करण्यात काहीशी अडचण येऊ लागली. त्यामुळे दैवतांना साकडे घालून, देवाचा शब्द घेतल्यानंतर हा सप्ताह कार्तिक एकादशीला साजरा करण्याचे ठरले.
भात शेतीची कामे उरकून सप्ताहाला पुरेसा वेळ लोकांना देता येऊ लागला. या सप्ताहाला गेल्या दीडशे वर्षांत भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले. जरी सात पारकरी अखंडपणे भजन दिंडी साजरी करीत असले तरी सारा गाव या सप्ताहात सहभागी होतो.
सप्ताहानिमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येतो. द्वादशी दिनी संध्याकाळी सर्व पारकरी मंडळी नंदादीपासमोर एकत्र जमतात. भजन, आरत्या सादर करतात. नंतर गाऱ्हाणे होते आणि सप्ताहाची सांगता होते. यातून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडते.
भजन सप्ताहानंतर गावात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक पर्व सुरू होते. प्रत्येक वाड्यावाड्यावर मंदिरामंदिरांमध्ये उत्सव साजरे होतात तोच उत्साह पुढे कायम राहतो.
असा हा मांद्रे गावचा भजन सप्ताह भजन दिंडी कलेची संस्कृती टिकवून आहे. प्रत्येक पारकरी मंडळांनी दिंडीची पताका आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. या सप्ताहाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतानाच राज्यातील लोकांचे तसेच शेजारील राज्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. हा कला आणि संस्कृतीचा संगम असलेला भजन सप्ताह प्रत्येक ग्रामवासीयाला उमेदीने जगण्याचा उत्साह देतो, चैतन्य देतो. सर्वांना श्री सत्तेश्वर श्री भगवती माता सुख, समृद्धी देवो, अशी सदिच्छा!

– दीक्षा शेट मांद्रेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar