पणजीतील धोकादायक कामांच्या विरोधात गोवा प्रदेश युथ काँग्रेसचे प्रदर्शन” />
स्मार्ट सिटीच्या कामात पारदर्शकता हवी
पणजी ः पणजीतील स्मार्ट सिटीच्या धोकादायकरित्या सुरू असलेल्या कामावर टीका करताना गोवा प्रदेश युथ काँग्रेसने शुक्रवारी विरोध प्रदर्शन केले. स्थानिक नागरिकांना विश्वासत न घेता, त्यांच्या समस्या न जाणून घेता स्मार्ट सिटीचे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याचे गोवा प्रदेश युथ काँग्रेसने दाखवून दिले.
आजाद मैदानावर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोवा युथ काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या काम हे पणजीकरांच्या डोकेदुखीचे कारण बनले आहे. मागील तीन-चार महिन्यात पणजीवासीयांचे आतोनात हाल झाले आहेत.
‘स्मार्ट सिटीचा प्लान कुठे आहे. गुपचूप, गुढ पद्धतीने काम का केला जात आहे. काम पूर्ण झालेल्या ठिकाणांची किंवा सुरू असलेल्या ठिकाणांची माहिती वेबसाईटवर का टाकली जात नाही. काम पूर्ण होण्यास किती दिवसांचा कालावधी लागणार. काम पूर्ण झाल्यानंतर पणजीवासीयांना याचा किती फायदा होणार. यासाठी किती कालावधी लागणार, असे अनेक सवाल यावेळी आंद्राद यांनी विचारले.
सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे. नगरसेवकांना कामाची माहिती का दिली जात नाही. स्मार्ट सिटी मंडळाचे अध्यक्ष असलेले मेयर या विषयावर पणजीवासीयांशी बोलण्यास का टाळाटाळ करत आहेत. मेयरना पणजीतील नागरिकांना विश्वासात घेण्यास अपयश आले आहे. स्मार्ट सिटीचे काम सामान्य नागरिकाला, पणजीला भेट देण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी आलेल्या पर्यटकाला डोकेदुखी ठरत आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी कामाची पाहणी करण्यासाठी अभियंते कधीच उपलब्ध नसतात. त्यामुळे कामाच्या स्वरुपाची माहिती मिळत नसल्याचे आंद्राद म्हणाले.
आम्ही वाहतूक पोलिसांशी या संबंधी बोलणी केली. परंतु, त्यांनीदेखील स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल नोंदविलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले नाहीत, असे आंद्राद म्हणाले.
उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रिनाल्डो रोझोरियो यांनी सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना स्मार्ट सिटीचे काम म्हणजे जनवळपास 1,000 कोटींचा घोटाळा असल्याचे प्रतिपादन केले आहे.
विकासाच्या नावाखाली लूट चालली आहे. आम्हाला नागरिकांच्या ही लूट लक्षात आणून द्यायची आहे. आम्ही या नियोजनशून्य कामाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. रस्ते खोदून ते कित्येक दिवस तसेच ठेवले जातात. कॅसिनोच्या सोयीसाठी एका रात्रीत रस्त्यांचे डांबरीकरण मात्र केेले जाते. हे का केले जाते, कॅसिनो सरकारच्या अखत्यारित येतात का, अशी संतप्त प्रतिक्रिया रिनाल्डो यांनी दिली.
दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष महेश नाडर यांनी सरकारचा गलिच्छ कारभार केवळ पणजीपुरती मर्यादित नसल्याचे सांगत संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले.
शहर स्मार्ट करताना लोकांच्या सुरक्षेविषयी विचार केला पाहिजे. रस्ता मध्येच खोदून तो तसाच ठेवण्याचे प्रकार अपघातांस कारणीभूत ठरले आहेत. सरकारला नागरिकांच्या सुरक्षेची तसुभर चिंता नाही. लोकांसाठी नाही तर जी20 बैठकीसाठी पणजीला नटवण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
पणजीच्या आमदारांनी पणजीचे लोक या स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल आनंदी असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. पणजीतील लोक आपला राग जाहीरपणे व्यक्त करत नसल्याने आमदारांना लोक समाधानी असल्याचे वाटत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरण्यास कधीच मागेपुढे पाहणार नसूवन प्रसंगी मंत्री व मुख्यमंत्र्याच्या घरावर धडक देखील देऊ शकतो. या विरोध प्रदर्शनात युथ काँग्रेसचे 80 पेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते. त्यांनी सरकारविरोधी घोषणादेखील दिल्या.