पणजी : भाजप सरकारने प्रयत्न केले असते तर गोवा हे लॉजिस्टिक हब बनले असते, पण भाजपने काहीही केले नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले.
पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, लॉजिस्टिक केंद्र निर्माण करण्यात, रोजगार निर्माण करण्यात आणि गोव्याच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यात भाजप अपयशी ठरला आहे.
यावेळी पणजीचे उमेदवार ॲल्विस गोम्स, सुनील कवठणकर आदी उपस्थित होते.
“गोव्यात किनारपट्टी आहेत. यासाठी गोवा एक महत्त्वाचे लॉजिस्टिक हब बनले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. लॉजिस्टिक सुलभतेमध्ये गोवा राज्यांमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“खाणकामातून मिळणाऱ्या महसुलातून सरकारांच्या तिजोरीला मोठी मदत होते. मात्र गो्वयात खाणकाम बंद आहे. भाजप खाणकाम पुन्हा सुरू करण्याची मुदत वाढवत आहे आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ते हा व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देत आहेत. आम्ही गोव्यातील लोकांना पर्यावरणाच्या दृष्टीने व शाश्वत मार्गाने हा व्यवसाय सुरु करण्याचे वचन देतो.” असे मिलिंद देवरा म्हणाले.
ते म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात जागतिक आर्थिक संकट कोसळले होते आणि व्यापारावर परिणाम झाला होता. “आम्ही राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली मोरमुगाव पोर्ट ट्रस्ट त्या काळात कार्यरत राहण्याची खात्री केली. गोदी कामगारांचे पगार दिले जातील याचीही आम्ही खात्री केली होती.” असे ते म्हणाले.
“आज सागरी पायाभूत सुविधांसाठी आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात काय केले गेले आहे.’’ असा त्यांनी प्रश्न केला आणि ते म्हणाले की, भाजपने काही पावले उचलली असती तर गोवा हे महत्त्वाचे किनारी केंद्र बनले असते.
“भाजपने पैशाची ताकद, मसल पॉवर आणि पक्षांतराने गोव्याचे राजकारण बदलले आहे. हे भाजपचे राजकारणाचे मॉडेल आहे.” असे देवरा म्हणाले.
ते म्हणाले की काँग्रेसने निवडणुकीच्या आदल्या दिवशी आलेल्या आणि आधीच कोसळून पडलेल्या पक्षांशी युती केली नाही. “आम्हाला गोव्यातील लोकांचा चांगला पाठिंबा आहे आणि आम्हाला ही निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे.” असे ते म्हणाले.
“लोकांना परिवर्तन हवे असल्याने गोव्यातील जनता काँग्रेसला मजबूत जनादेश देईल.” असे देवरा म्हणाले.
“आम्ही गोव्याचे हरवलेले वैभव आणि चमक परत आणू.” असे त्यांनी म्हटले.