स्वतःच्या चुका ओळखून त्या वेळीच सुधारल्या तर विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. – डॉ. राजाराम परब.
थिवी वाताहार
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. नंतर त्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या माणसांचा अभ्यास करून, त्यांना आदर्श ठेऊन आपली वाटचाल केली पाहिजे. हे करत असताना आपल्याकडून होणाऱ्या चुका ओळखून वेळीच त्या सुधारल्या पाहिजेत असे प्रतिपादन परफेक्ट अकॅडमीचे डॉ. राजाराम परब यांनी केले. हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयराम परब व हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोविंदराज देसाई उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजाराम परब यांनी यावेळी उपस्थित बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई व जीसीईटी यासारख्या स्पर्धात्मक परीक्षा व परफेक्ट अकॅडमी त्याबद्दल देत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल विस्ताराने माहिती दिली.
संस्थेतील विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी डॉ. परब यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल असे मत यावेळी बोलताना हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्याच्या हितासाठी अशाप्रकारचे उपक्रम वेळोवेळी राबविले जातील, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य गोविंदराज देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. शिक्षिका सौ. श्रेया कासकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शामला नाईक रेडकर यांनी केले तर अतुल नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.