‘मडगाव मास्टर प्लान २०४१’ म्हणजे छुप्या हेतुचा राजकीय स्टंट : चिराग नाईक
मडगाव : काँग्रेस नेते चिराग नाईक यांनी मडगाव ड्राफ्ट मास्टर प्लान २०४१ वर टीका करत शहराच्या नियोजनकर्त्यांवर अनावश्यक घाईने प्लान पुढे रेटण्याचा आरोप केला आहे. गेल्या ३० वर्षांत शहरात कोणताही मोठा बदल झाला नाही आणि आता ते केवळ “सौंदर्यदृष्ट्या बदल” करून लोकांना गोंजारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“३० वर्षांपासून मडगावमध्ये काहीच घडलेले नाही आणि आता आमचे मडगाव आमदार दोन दिवसांत सूचना द्या असे सांगत आहेत? हा एक राजकीय स्टंट आहे. मडगावचं हृदय, मेंदू आणि अंतर्गत यंत्रणा थकून गेल्या आहेत. मडगावची कायदा आणि सुव्यवस्था, मलनिस्सारण व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियमन व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्या आहेत,” असे नाईक म्हणाले.
“आता हे शहराची केवळ वरवरची सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. चेहऱ्यावर मेकअप करून सगळं काही ठीक असल्याचे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. हा एक नाटकबाजपणा आहे. यामागे काही तरी गुप्त हेतू आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
चिराग नाईक यांनी सांगितले की, ते मडगाव नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या सादरीकरणावेळी उपस्थित होते आणि हे नियोजन व्यवस्थित पद्धतीने व्हायला हवे होते.
“आम्ही सरकार जे काही करतं त्याला विरोध करतो असं समजून घेऊ नका. जर मडगावसाठी काहीतरी चांगले होत असेल, तर ते कोण करतंय याचं महत्त्व नाही. पण ते नीट पद्धतीने व्हायला हवे,” असं ते म्हणाले. “हे नियोजन बाहेरील सल्लागाराने तयार केले आहे, ज्यांना मडगावचे अ, ब, क सुद्धा माहीत नाही.”
१६ जून रोजी मडगाव नगरपालिकेने मडगाव शहराच्या मास्टर प्लान २०४१ संदर्भात अधिसूचना जारी केली होती.
“मी त्या सादरीकरणासाठी सभागृहात होतो. हा जो मास्टर प्लान तयार करण्यात आला आहे, त्याला काही अर्थच नाही,” ते म्हणाले.
“या सल्लागाराला मडगावची प्राथमिक माहितीही नाही. त्यांनी गुगल मॅपिंग्स, एआय आणि इतरांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे नियोजन करण्यात आले आहे. त्यांनी लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“ही गंभीर बाब आहे. आम्ही टीका केली कारण हे सगळे घाईघाईने केले जात आहे. आम्ही विचारले की एवढी घाई का? याला एक नीट प्रक्रिया असावी लागते, म्हणूनच आम्ही पुढे आलो आहोत,” असेही चिराग नाईक यांनी स्पष्ट केले.